आष्टी प्रतिनिधी
आष्टी,जिल्हा बीडच्या पंचक्रोशीत योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले आणि स्वतः 50 लाख रुपये खर्च करून होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका स्थापन करून, तळमळीने रोजगार शिक्षणासाठी पात्रता निर्माण करा,असा प्रचार प्रसार करणारे सेवानिवृत्त प्रा.भा.दे.तथा भाऊसाहेब देवराव जगताप यांचा शैक्षणिक,सामाजिक कार्याबद्दल सकल जैन श्रावक संघाच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल,मानचिन्हच्या स्वरूपात महावीर रत्न पुरस्कार देऊन गौरव सन्मान करण्यात आले.या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आष्टी,जिल्हा बीड येथील आनंद ऋषीजी चौक,कापड बाजार येथे प्रसिद्ध वक्ते प्रा.गणेश शिंदे यांचे…. जीवन सुंदर आहे……. या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाची नांदी म्हणून कवी हरिश हातवटे,युवराज वायभासे यांच्या कवितांनी बहार उडवून दिली.जोडीला कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने व्याख्यानाला काव्यमय झालर मिळाली.दुपारच्या भगवान महावीर प्रतिमा मिरवणुकीत माजी मंत्री तथा आ.सुरेश धस यांनी सहभाग घेतला.प्रा.गणेश शिंदे यांनी व्याख्यानात सांगितले की,जग फार सुंदर आहे.सुखाच्या शोधात आपण फिरत राहतो,पण ते आपल्या जवळ आहे.भोवताली आहे.त्याचा शोध घ्या.बदलत्या शहरीकरणामुळे,मोबाईल युगामुळे खूप लहान सहान गोष्टी आपल्या दुःखाचे कारण बनल्या आहेत.आपण आपली जवळची नाती विसरत आहोत.जग जिंकण्याच्या नादात आई,वडिलांना विसरत चाललेलो आहोत.रामायण,महाभारतातल्या अनेक नातेसंबंधावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.सहज ओघवत्या भाषेतूच,तुज आहे,तुझं पाशी चा धागा धरून त्यांनी शब्दांची छान गुंफण केली.आणि रसिक श्रोत्यांची मने जिंकली.कवी हरीश हातवटे यांनी… दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते,कुठं जरी मेल तरी माती गावातच होते….!! सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव,ज्याला असते काळीज,त्याला म्हणतात गाव….!! तसेच कवी युवराज वायभासे यांची कविता,कव्हा येणार र सांगा,मव्हा बाबा हेव भेटीला,येतो लवकर म्हणून दिल वचन र मला….!! ही वडिलांवरची हृदयस्पर्शी कविता.दोघांनीही कविता गाऊन सादर केल्या आणि रसिक श्रोत्यांचे काळीज हेलावून टाकले.सकल जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुखलालजी मुथा,उपाध्यक्ष संजय शेठ मेहेर,सचिव अतुल शेठ मेहेर, राहुल मुथा,विजय बोगावत,सुमतीलाल मेहेर,नवीन कासवा,संतोष शेठ मेहेर,नितीन मेहेर,नवनीत कटारिया यांनी काव्य,सुश्राव्य कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,अजय धोंडे,आजबे, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,डॉ.नदीम शेख,रंगनाथ धोंडे,दत्ता काकडे,उत्तम बोडखे,शरद रेडेकर,गणेश दळवी,प्रवीण पोकळे,अविशांत कुमकर,सर्व व्यापारी वर्ग,शिक्षक,वकील आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय,महिलावर्ग उपस्थित होता.यावेळी स्नेहल कासवा,मीनल कासवा यांना उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.विजय बोगावत यांनी आभार मानले.