गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील तलवाडा सर्कल जवळ असलेले पांढरवाडी शिवारात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे कापूस उत्पादक पिकांना धोका निर्माण झाला आहे. उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
तालुक्यात सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे शेतात थैमान घातल्याने दोन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाल्याची घटना समोर आली आहे. सततच्या पावसामुळे तब्बल दोन एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेवराई येथील तलवाडा सर्कल जवळ असलेले पांढरवाडी गावातील शेतकरी विष्णू आसाराम निकम यांच्या शेतातील अंकुरलेले पीक पावसामुळे रानात साचलेल्या पाण्यामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेत जमीनीचा कापुस पिक पाण्यासोबत वाहून गेला आहे. खरडून गेलेने शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आधीच पिकाचे नुकसान झाले आहे त्यातच जमीन खरडून गेल्याने दीर्घकाळासाठी याचा परिणाम होणार असल्याने शासनाने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी विष्णू निकम यांनी केली आहे.